
ठाणे, ता.२६ (प्रतिनिधी)— जिल्हा परिषद ठाणे येथे आज, दि. २६ नोव्हेंबर, २०२५ रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यालयाच्या आवारात सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी संविधान दिनाचे महत्त्व, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानातील मूल्ये आचरणात आणणे आणि कार्यक्षेत्रात पारदर्शकता व जबाबदारी ठेवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरूडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, नरेगा गट विकास अधिकारी प्राची साळसकर, महिला व बाल कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती पाटिल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, लेखाधिकारी सज्जला विसपुते, पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) डॉ. किर्ती डोईजोडे, लेखाधिकारी (२) रविंद्र सपकाळे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “उद्देशिका भिंत” तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला असून गावातील प्रमुख व मध्यवर्ती ठिकाणी आकर्षक भित्तीचित्रांच्या माध्यमातून भारतीय संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करण्यात आली आहे. या उपक्रमात स्थानिक ग्रामीण कलाकार, स्वयंसहाय्य गट (SHGs), ग्रामीण युवा आणि स्थानिक समुदाय यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पंचायत समिती भिवंडी अंतर्गत अंजूर, कल्याण तालुक्यातील जांभूळ आणि मुरबाड तालुक्यातील सिंगापूर येथील पंचायत लर्निंग सेंटर (PLCs) मध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. या माध्यमातून नागरिकांमध्ये संविधान मूल्यांची ओळख मजबूत करण्याबरोबरच लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली.